एमआयडीसी च्या पुढाकारातून कृषी औद्योगिकरणाला गती देण्याची गरज : महाएफपीसी

मुंबई, २८ जुलै : कोरोना संकटानंतर कृषी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र शासनाने वटहुकुमांद्वारे कृषी पणन सुधारणांची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कृषी पायाभूत सुविधा निर्माण करून कृषी औद्योगिकरणाला बळकटी देण्याची गरज आहे. राज्याच्या विकासात उद्योग विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या एमआयडीसी मार्फत औद्योगिकरणाला मोठी गती आली. त्याच धर्तीवर राज्यातील औद्योगिकरणाचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी शेतीशी निगडित असणाऱ्या उद्योगधंद्यांना पायाभूत सुविधा विकसित करून देऊन कालबद्ध शेती विकासाचे उद्दिष्टय ठेवण्याची गरज असल्याचे मत महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याशी व्यक्त केले. याबाबत उद्योगमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असून शासन शेती व शेतकऱ्यांच्या विकासाबाबत कटिबद्ध असल्याचे सांगितले.